रायगड - जिल्हा परिषदेत सत्तेचा तोल राखत महायुतीत समन्वय साधण्यात आला आहे. सभापती पदासाठी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून, राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत झाली होती. मात्र, निकालानंतर सभापती पदांच्या वाटपात समतोल राखत तिन्ही पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. शिवसेनेकडून रसिका केणी आणि चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादीकडून नारायण डामसे तर भाजपाकडून वैकुंठ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, सभापती पदांच्या वाटपात शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी आणि भाजपाला प्रत्येकी एक पद देण्यात आले आहे. यापूर्वी अध्यक्षपद भाजपाकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यात आले होते. त्यामुळे महायुतीत संतुलन राखण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. सभापती निवडीच्या वेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे आणि भाजपाचे नेते सतिष धारप उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापतींवर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
Comments