रायगड : महाडच्या सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेल्या चवदार तळ्याचे जतन, संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी एकूण 55 कोटी 79 लाख रुपयांचा निधी यावर्षी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी 2024 मध्येही 7 कोटी रुपयांचा निधी सौंदर्यीकरणासाठी देण्यात आला होता. त्यामुळं एकूण मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याने कामांना गती मिळणार आहे. तसंच पुढील वर्षी चवदार तळे सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. याबाबतची माहिती माहिती राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली. "चवदार तळ्याच्या परिसरात सध्या सांडपाणी मिसळण्याचा प्रश्न गंभीर बनला असून तळ्याचे पाणी प्रदूषित होण्याची समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून संरक्षण भिंत उभारणे, सांडपाणी तळ्यात जाणार नाही यासाठी स्वतंत्र निचरा व्यवस्था तयार करणे, तसंच अत्याधुनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत," असं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं. याशिवाय, "तळ्याभोवती सुशोभिकरण, आकर्षक प्रकाश योजना, पादचारी मार्ग, बसण्याची सोय, हरित पट्टा निर्माण करणे आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा देखील या योजनेत समावेश आहे. सत्याग्रह शताब्दी वर्ष लक्षात घेता महाड शहराची ओळख अधिक भव्य आणि प्रेरणादायी स्वरूपात उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे," असंही मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं. दरम्यान, या निधीसाठी मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे विशेष पाठपुरावा केल्याचंही मंत्री भरत गोगावले यांनी नमूद केलं.
Comments