रायगड - देशाच्या सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सीआयएसएफच्या ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन २०२६ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथून आभासी ध्वजप्रदर्शनाने शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले असून देशभरात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, आज रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातून सायक्लोथॉनच्या पुढील टप्प्याला औपचारिक सुरुवात करण्यात आली. विद्यापीठ परिसरात सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या हस्ते सहभागी सायकलपटूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, माणगावच्या पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे तसेच प्रशासनातील अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही सायक्लोथॉन तब्बल २५ दिवस चालणार असून सीआयएसएफच्या दोन सायकलिंग टीम्स पश्चिम बंगालमधील बक्कखाली आणि गुजरातमधील लखपत येथून मार्गस्थ झाल्या आहेत. सुमारे ६ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करत या मोहिमेद्वारे ९ किनारी राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश जोडले जाणार आहेत. किनारी सुरक्षा अधिक मजबूत करणे, अंमली पदार्थ आणि शस्त्र तस्करीविरोधात जनजागृती करणे, तसेच किनारी भागातील नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.विशेष म्हणजे या सायक्लोथॉनमध्ये महिला सक्षमीकरणाचा ठसा उमटताना दिसत असून सुमारे ५० टक्के महिला सायकलपटूंचा सक्रिय सहभाग आहे. युवकांमध्ये तंदुरुस्ती, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यावरही भर दिला जात आहे. याशिवाय, या मोहिमेदरम्यान ५२ किनारी गावे दत्तक घेऊन तेथे सामाजिक आणि पायाभूत सुविधा विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.देशाच्या सागरी सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही भव्य सायक्लोथॉन २२ फेब्रुवारी रोजी कोची येथे समारोपाला पोहोचणार आहे. रायगडमधील या स्वागत सोहळ्यामुळे मोहिमेला अधिक बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
Comments