रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या पावन आणि पवित्र पर्वावर संपूर्ण रत्नागिरी शहर विठ्ठलमय झालं होतं. 'ज्ञानबा तुकाराम' आणि 'जय हरी विठ्ठल'च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. यंदा रत्नागिरी शहरात विविध भागांतून अनेक दिंड्या निघाल्या होत्या, मात्र यामध्ये मिऱ्यावासीयांनी काढलेली दिंडी विशेष आकर्षण ठरली. मिऱ्यावासीयांनी यंदा पहिल्यांदाच अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात स्वतःची स्वतंत्र दिंडी आयोजित केली होती. मिऱ्या गावातून सुरू झालेला हा प्रवास 'प्रतिपंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरापर्यंत अत्यंत उत्साहात पार पडला. आषाढी वारीनिमित्त पायी दिंडी घेऊन जाण्याची परंपरा कायम राखत मिऱ्या गावातील महिला, पुरुष आणि तरुण नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. हातात फडकणारे भगवे झेंडे, टाळ-मृदंगाचा नाद आणि विठुरायाचा अखंड नामघोष यामुळं संपूर्ण मिऱ्या गाव आणि दिंडीचा मार्ग भक्तिरसात न्हाऊन निघाला. पारंपरिक पोशाखात सज्ज झालेले ग्रामस्थ, माथ्यावर तुळशीवृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला यामुळं या पहिल्यावहिल्या दिंडीला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले होते. मिऱ्यावासीयांच्या या उपक्रमामुळं संपूर्ण परिसरात आषाढी एकादशीचा एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
Comments