पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री दत्तात्रय भरणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, सध्या पवार कुटुंबीय दुःखात असून जोपर्यंत तेरावा होत नाही, तोपर्यंत यावर चर्चा करणे योग्य नाही. तेरावा झाल्यावर पक्षातील वरिष्ठ नेते बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून इंदापूर येथे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले की, आमचे नेते अजित पवार आज या जगात नसून या गोष्टीचं आम्हाला दुःख झालं आहे. ते नसल्यानं आज मतदानात ते जाणवत आहे. आज दादांच्याविना ही निवडणूक होत आहे याचं खूपच दुःख होत आहे. आज मतदार हे दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मतदान करणार आहेत. तालुक्यात 24 च्या 24 जागा आम्ही चांगल्या मतांनी जिंकू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
Comments