रायगड : केंद्र सरकारच्या महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या इंधन दरांच्या धोरणांविरोधात रायगड जिल्हा काँग्रेसनं शुक्रवारी (दि. 29) अलिबागमध्ये अनोखं आंदोलन छेडत सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. कमरेला नारळाच्या झापा बांधून आणि बैलगाडीतून मोर्चा काढत काँग्रेसनं सर्वसामान्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अलिबागमधील काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. हातात विविध फलक, बॅनर आणि सरकारविरोधी घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरलं. पेट्रोल, डिझेल, गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडलं असून, बेरोजगारीमुळं तरुण वर्ग हतबल झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Comments