रायगड - शिवजयंतीचं औचित्य साधत किल्ले रायगडावर एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. लेखक गौतम कोतवाल यांनी स्वतः लिहिलेल्या तब्बल ५० पुस्तकांचं प्रकाशन थेट शिवरायांच्या चरणी अर्पण करून केलं. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले रायगडावर शिवजयंतीनिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या शिवप्रेमी आणि पर्यटकांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी कोतवाल यांनी आपली पुस्तकं उपस्थित शिवप्रेमी आणि पर्यटकांना मोफत वाटप करून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकांमध्ये विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या अधिकारी, शेतकरी, उद्योजक आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या प्रेरणादायी यशोगाथांचा समावेश आहे.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुष्यात कोणता मार्ग निवडावा, करिअर कसे घडवावे आणि संघर्षाच्या काळात स्वतःला कसे उभे करावे याबाबत अनेक तरुणांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. अशा तरुणांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने गौतम कोतवाल यांनी ही मार्गदर्शक स्वरूपाची पुस्तके लिहिली आहेत.स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष अनुभवत पुढे यश मिळवल्यानंतर, पुढील पिढीला तोच संघर्ष करावा लागू नये, तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा उपक्रम राबविल्याचे गौतम कोतवाल यांनी सांगितले. शिवरायांच्या प्रेरणेतून तरुणांनी ध्येय ठरवून जीवनात पुढे जावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
Comments