लातूर : राचन्नावाडी येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. यावेळी सांडोळ-महांडोळ मार्गावर ही बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 22 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक समोर आली आहे. स्कूल बसचा नियमित चालक आळंदी वारीला गेला आहे. त्याच्या जागी त्यानं बदली चालक पाठवला होता. मात्र, बदली चालक दिल्याची माहिती शाळा प्रशासनाला दिली नव्हती, अशी चर्चा सुरू आहे. एमएच 12 पीक्यू 5120 ही स्कूल बस नेहमीप्रमाणं विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेली. यावेळी बदली चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होता. त्यामुळं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात 22 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चाकूर इथं दाखल केलं आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Comments