रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गाची दुरवस्था आणि सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना यूबीटीनं अनोखे आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चक्क झाडे लावत शिवसेना यूबीटीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून महामार्गाच्या पाहणीसाठी बैठका आणि दौरे केले जात असले तरी प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था सुधारलेली नाही, अशी टीका जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून सर्व्हिस रोडचीही अवस्था खराब झाली आहे. पावसामुळं या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडं प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना यूबीटीनं केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना यूबीटीच्या वतीनं आज मुंबई-गोवा महामार्गावर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सरकारचा निषेध करण्यात आला. खड्ड्यांमध्ये झाडे लावताना कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Comments