रायगड - जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेने पक्षबांधणीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा स्पष्ट नारा दिला आहे. दक्षिण रायगडमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाने थेट मैदानात उतरून संपर्क अभियान राबवायला सुरुवात केली आहे.मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. रोहा, तळा, श्रीवर्धन आणि म्हसळा या भागांसाठी नवनिर्वाचित संपर्क प्रमुख संजय कदम यांनी सलग दोन दिवसांचा दौरा करत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.या दौऱ्यात त्यांनी विविध शाखांना भेटी देत स्थानिक पातळीवरील अडचणी, संघटनात्मक स्थिती आणि आगामी निवडणुकांची तयारी याचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत पक्षाची ताकद वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले.मागील विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला तब्बल ६२ हजार मते मिळाल्याचा उल्लेख करत, हीच ताकद आगामी नगरपंचायत निवडणुकांमध्ये विजयात रूपांतरित करण्यासाठी ठोस रणनिती आखली जात असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी बूथस्तरावर काम वाढवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments