शिर्डी - देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात सहकार क्षेत्राचे योगदान अत्यंत मोलाचे राहिलेले आहे. मात्र, हे क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्याचे आगामी सहकार धोरण हे पूर्णपणे राजकारणमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त असणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांनी केले आहे.महाराष्ट्र प्रदेश आणि सहकार भारती अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने आज शिर्डीत सहकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिर्डीत सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आज संपूर्ण देशात सुमारे साडेसहा ते सात लाख सहकारी संस्था कार्यरत असून जवळपास 30 ते 35 कोटी जनता या क्षेत्राशी थेट जोडली गेलेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे योगदान अतिशय प्रचंड आहे. एकट्या महाराष्ट्रात अडीच ते पाऊण तीन लाख सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. राज्याची लोकसंख्या 12 ते 13 कोटी असताना त्यातील तब्बल 8 कोटी लोक सहकार क्षेत्राशी जोडले गेले आहेत. इतकी मोठी सामाजिक आणि आर्थिक जबाबदारी या क्षेत्रावर असल्यानेच एक भक्कम आणि सक्षम सहकार धोरण आखण्यासाठी सहकार भारती प्रयत्नशील आहे.
Comments