शिर्डी - हरिश्चंद्र-कळसुबाई अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोले तालुक्यातील पांजरे येथील गडदुआई परिसरात भूस्खलन झालं आहे. या घटनेत हरी शांताराम उघडे यांचं संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं असून त्यांच्या घरातील आठ शेळ्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्याचवेळी वेळेवर राबवलेल्या बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते भाऊ उघडे यांनी तातडीनं आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याशी संपर्क साधला. आमदारांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लगेचच आपले कार्यकर्ते घटनास्थळी रवाना केले. तर वनविभागाचे अधिकारी शंकर लांडे, त्यांचे सहकारी, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांची टीम, घाणघरचे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गभाले आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत तातडीने संयुक्त बचाव मोहीम राबवली. या मदतकार्यादरम्यान हरी उघडे यांच्यासह परिसरातील अन्य तीन धोकादायक स्थितीतील कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
Comments