नवी मुंबई : इंधन दरवाढ आणि प्रचंड उष्णतेचा परिणाम नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये दिसून येत आहे. उष्णता आणि अवकाळी पावसामुळं शेतीमालाचं मोठं नुकसान झालं असून, त्यात इंधन दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळं एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या आणि फळांच्या दरात तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर झाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये नगर, नाशिक, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळांची आवक होते. काही भाज्या परराज्यातूनही आणल्या जातात. मात्र, उत्पादनात घट आणि इंधन दरवाढ यामुळं टोमॅटो, शेवगा, पालक, मेथी, वांगी, दोडका, शेपू, कांदापात, घेवडा, गवार, फ्लॉवर, फरसबी, भेंडी, भोपळा, चवळी, शेंगा, कारली, कच्ची केळी, फणस, रताळी आणि कोथिंबीरच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Comments