बीड : एकीकडं मुंबईत राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे रंगत आहेत. दुसरीकडं, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून लोकप्रतिनिधींना थेट राजीनाम्याचा इशारा देण्यात आला आहे. अखिल भारतीय किसान सभेनं जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या बॅनरमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या पीकविमा, सरसकट कर्जमाफी आणि शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, या मागण्यांकडं लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अंबाजोगाई, लिंबागणेश, परळी, धारूर, सिरसाळा, माजलगावासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये किसान सभेनं बॅनरबाजी केली आहे. या फलकांवर स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आलं आहे की, "सरसकट कर्जमाफी, 2025 चा पीकविमा, घोषित शेतकरी अनुदान आणि इतर शेतीविषयक प्रश्नांवर सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवणार नसाल, तर राजीनाम्याचा मार्ग स्वीकारा."