आळंदी (पुणे) - रक्षाबंधनानिमित्त आज आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलीना वाघोली येथील संपतआबा गाडे वारकरी कुटुंबीयांनी अतिशय आकर्षक अशी चांदीची राखी अर्पण केली आहे. बहिण-भावांच्या अतिशय पवित्र अशा नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाची चांदीची राखी अर्पण केली आहे. वारकरी मंडळी हे ज्ञानेश्वर माऊलींना आपलं सर्वस्व मानत असतात. अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील गाडे या वारकरी कुटुंबीयांनी सलग तीन वर्ष सोन्याची राखी आणि यावर्षी माऊलींच्या स्वर्ण कलशासाठी सोने दान करून माऊलींना अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाची चांदीची राखी अर्पण करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. तसंच यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी बांधवांना चांगलं उत्पन्न मिळून त्यांची सुख, शांती आणि समृध्दीने भरभरून प्रगती होऊ दे अशी प्रार्थना गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊली चरणी केली आहे.
याविषयी गाडे कुटुंबियांना विचारलं असता, त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की,आम्ही गेली तीन वर्षे झाली आम्ही रक्षाबंधनादिवशी माऊली चरणी सुवर्ण राखी अर्पण करत असतो. परंतु यंदाच्या रक्षाबंधना दिवशी चांदीची राखी अर्पण केली आहे. माऊलींचा मुख्य मंदिराच्या कळसाचं काम सुरू होणार आहे. यावेळी आम्ही सोन्याचा कळस करण्याचा मानस आहे. माऊलींच्या भक्तीच्या मायेत आमच्या आईची खूप मोठी भावना आहे. याच अनुषंगानं आईच्या प्रेमापोटी आम्ही गेली तीन वर्षापासून माऊलीचरणी राखी अर्पण करतो, अशी माहिती गाडे कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Comments