बीड : मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस राज्यातील सर्वच जिल्ह्यात सुरू झाला आहे. तर संपूर्ण भारतात जून महिन्यात सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पाऊस बरसणार, असं हवामान विभागानं स्पष्ट केलय. या पावसामुळे शेतपिकाचं अतोनात नुकसान होत आहे. तर आष्टी तालुक्यातील लिंबोडी कडा प्रकल्पाचे दरवाजे पाटबंधारे विभागाने एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी खोलले होते. ग्रामस्थांनी पंधरा दिवसापूर्वी त्यांना सूचना दिल्या होत्या की, दरवाजा बसवण्यात यावा. परंतु, पाटबंधारे विभागाने दरवाजे न बसल्यानं लिंबोडी परिसरातील शेतीचं आणि विहिरीचं तसंच काढून ठेवलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आता झालेल्या नुकसानीची दखल कोण घेणार? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत. तर फुटलेल्या पाटाच्या पाण्यात उभे राहून प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांनी 'बोंबाबोंब आंदोलन' करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Category
🗞
News