अहिल्यानगर : जिल्ह्यातील कत्तलखाने आणि मशिदीवरील भोंगे उतरवण्याकरिता गेल्या तीन दिवसापासून मढी गावचे सरपंच संजय मरकड ग्रामस्थांसह अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. गुरूवारी उपोषणाचा तिसरा दिवस असून मरकड यांच्या उपोषणाला हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी भेट दिली. यावेळी मिलिंद एकबोटे यांनी जिल्ह्यातील प्रशासनासह राज्य सरकारवर सडकून टीका केली. "गो हत्या थांबली पाहिजे ही मागणी काही चुकीची नाही. मात्र, या मागणीसाठी उपोषण करावे लागते हे दुर्दैव आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये गो हत्या होत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून ठोस करवाई केली जात नाही. एकीकडं सीमेवर आपले सैनिक ऑपरेशन सिंदूर राबवून देशसेवा करत आहेत. सैनिक देशाचे रक्षण करतात तर दुसरीकडं आपले पोलीस प्रशासन हे ऑपरेशन भ्रष्टाचार राबवत आहे. केवळ भ्रष्टाचारासाठी व केवळ आपल्या फायद्यासाठी हे प्रशासन अत्यंत बेजबाबदारपणं वागत आहे," अशी टीका मिलिंद एकबोटे यांनी केली.