धाराशिव : गेल्या 40 ते 45 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हिरवीगार पिकं आता सुकू लागली असून, यामुळं बळीराजा अक्षरशः हवालदिल झालाय. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सलगरा-दिवटी मंडळातील किळज येथील शेतकरी अजित शिवाजी पवार यांनी आपल्या शेतातील अडीच एकर सोयाबीन पीक पेटवून दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस न पडल्यानं जिल्ह्यातील अनेक भागांतील सोयाबीन पिकं वाळून गेली आहेत. यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याच नैराश्यातून किळज येथील शेतकरी अजित पवार यांनी आपल्या शेतातील अडीच एकर सोयाबीन पेटवून दिलं आहे. या घटनेमुळं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनानं तातडीनं नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Comments